Monday, October 22, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण -१३


सकाळी नवाच्या ठोक्याला बन्या पार्टी ऑफिसला येणार हे माहित होतं. संत्या सकाळी आवरुन बन्याच्या आधी तिथं पोहोचला होता. बन्या आला तो मोठाल्या दोन पिशव्या घेऊन. त्यात बऱ्याच फायली होत्या, कागद होते. त्याचं सामान बघून संत्या दचकलाच. हातातलं सामान घ्यायला धावला तर बन्या म्हणाला,"अजून चार पिशव्या हायत, गाडीला लावलेल्या."
संत्या त्या पिशव्या घ्यायला धावला. ढीग टेबलावर ठेवून बन्या संत्याच्या समोर बसला. एकेक फाईल काढून सांगू लागला.
"संतोषराव, या दिवसाची वाट बघत होतो. गावाच्या कामासाठी तुमच्या पप्पांसोबत इतकी वर्षं काम करतूय. रोज मेलं तरी काम संपणार न्हाई, इतकं काम हाय. ही बघा, रस्त्यावरच्या दिवांच्या मागणीची फाईल. ही घंटागाडी सुरु करायची मागणी असलेली. ही बज्या पाटलाची कोर्टाच्या कामाची. त्याचा म्हातारा कोर्टाचं चक्कर मारुन झिजून मेला पर त्याला न्याय मिळाला न्हाय आजवर. प्यायच्या पाण्याच्या शुद्धीकरणाची, वाढीव बसच्या मागणीची, कुनाची कर्जमाफीची. अजून पायजे तितक्या देतो. यातली थोडी काम आपल्या हातात हायत तर बाकीची कामासाठी हेलपाटे घालाय मानूस न्हाई म्हनून ऱ्हायलेली.

        आबा किती ठिकानी फिरणार? तलाठ्याचं हापिस, ग्रामपंचायतीचं हापिस, पंचायत समिती, सारखं चालूच असतंय त्यांचं काम. बरं हिथं लोकांना नुसतं काम करुन पायजे, मदत नको करायला. प्रत्येक कार्यकर्त्याला बोलावून कामाला लावला पायजे. हे सगळं कोन करनार? आपल्या गावाच्या तक्रारी आपन मांडल्या नीट तर सरकार कायतर करनार त्यावर. रोज तुमी पोरं हिथं धुडगूस घालत बसताय, त्या परीस पोरांना कामाला लाव. कोपऱ्याकोपऱ्याव ढिगानं कचरा पडलाय. तिकडं शाळेत पोरांना पाण्याची चांगली टाकी बी न्हाई. करेल तितकं कमीच हाय. बघ, वाच आधी समदं. ", बन्या बोलत होता आन संत्या ऐकत होता. दहा वाजले तसं बन्या उठला.

"जावं लागल, काम हाय. पर तुला सांगतो मी लागली ती मदत करीन. असा कुढत बसू नगंस. ",बन्या बोलला.
संत्यानं मान हलवली.

बन्या निघून गेला आणि संत्याचं डोकं पार गोंधळून गेलं. फायलींचा ढीग घेऊन तो बसला होता. एकेक करत त्यातली माहिती वाचण्यात दुपार कधी झाली कळलंच नाही. अम्या तावातच आला. गाडी स्टॅन्डवर लावून तडक त्याच्या केबिनमध्ये घुसला. त्याच्याकडे बघून संत्या दचकलाच.

"काय रं, कवाधरनं तुला फोन करायलोय. चार दिवस झालं. म्हनलं इतका राडा झालाय त्यादिवशी, जरा शांत होवू द्यावं. पन तू तर साधा फोन बी करनास. मी, विक्या किती वाट बघायची?", अम्या बोलला.
"हे बघ बस हितं.", संत्यानं दोन फायली त्याच्याकडं देऊन त्याला वाचायला सांगितलं.
"मी काय करु यांचं?", अम्याला काय कळंना.
"वाच तरी. ",संत्यानं त्याला बसवलाच.

गावातल्या शेतकऱ्याच्या अर्जांची फाईल होती ती. कुणी किती पैसे खर्च करुन, पिकाला पाणी देऊन, किती कर्ज काढून, त्यांना किती नुकसान झालं याची. एकेका शेतकऱ्याच्या कर्जाची आणि नुकसानाची रक्कम बघून अम्या घाबरलाच. गावात किती विहिरी आहेत, कितींना पाणी नियमित येतं, उन्हाळ्यात कुठल्या विहिरींचं पाणी आटतं. कालव्याला किती पाणी आलं पाहिजे. अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत कालव्याचं पाणी न्यायला किती त्रास होतो. तो कसा कमी करता येईल, इरिगेशन साठी सरकारनं दिलेला किती पैसा प्रत्यक्षात गावापर्यंत पोचला होता. एक ना अनेक भानगडी होत्या.

        अम्या जरा वेळ बसून वैतागून निघून गेला. संत्यानं अम्यानेच आणलेलं जेवण करुन परत कामात गुंतला होता. संध्याकाळी कधीतरी अंधार पडल्यावर तो ऑफिसमधून बाहेर पडला. सकाळपासून डोक्यात नुसती भर पडत होती. त्यातला प्रत्येक विचार सुटा करुन त्याला निवांत वेळ द्यायला झालाच नव्हता. डोकं सुन्न झालं होतं. संत्या गाडीवर बसला आणि शाळेकडे गेला. शाळेच्या मैदानाच्या दूरच्या कोपऱ्याला एक वडाचं झाड होतं आणि त्याच्या आजूबाजूने बांधलेला कट्टा. शाळेची पोरं तिथे डबा खायला आणि नंतर पारंब्यांना लटकून खेळायला सतत असतंच. संत्याचीही ती आवडती जागा होती. गाडी बाजूला लागून तो कट्ट्यावर बसून राहिला. अंधारून आलेलं. समोर अजून दोन चार पोरं खेळतच होती. त्यांच्याकडे बघून त्याला शाळेतली आठवण झाली. कबड्डी आणि खो खो चे सामने जिंकले होते शाळेने तेव्हाची. त्यांच्या संघाचा मोठा सत्कार झाला होता आणि त्यांचा नायक म्हणून त्याला मिळालेलं विशेष पारितोषिक. आयुष्यात पहिल्यांदा शाळेत कसलंतरी बक्षीस मिळालेलं. बाकी अभ्यासाची बक्षिसं घ्यायला सपना होतीच.

        'सपना' त्याला नाव घेताना परत त्याच्या काळजात चरचरलं. पण त्या प्रसंगाची बोच कमी झाली होती. तिच्यासोबतचे शाळेतले वेगवेगळे किस्से त्याला आठवू लागले आणि तिच्यावरचा राग बराच कमी झाला. बसमागे धावणारी, ट्रॅक्समध्ये अभ्यास करणारी, पळत येऊन पैसे देणारी सपना त्याला आठवली आणि ओठांवर हसू आलं. किती बोचरी असते ना कातरवेळ? कितीही नाही म्हटलं तरी त्या वेळी येतेच आठवण आपल्या माणसाची. आपलं नसलं तरी आपलं हवं असं वाटणाऱ्या एखाद्याची. अनेकदा ती आपल्यासोबत या कट्ट्यावर बसावी असं वाटायचं त्याला. तिथे बसून त्यांनी काय गप्पा मारल्या असत्या माहित नाही. त्याच्या ओठांवर ग्रेसचं गाणं येऊ लागलं,
"भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकवली गीतें.".

           कितीतरी वेळ तो तसाच कट्ट्यावर बसून राहिला. आपण तिच्याशी ग्रेसच्या गप्पा मारल्या असत्या का? संत्याला प्रश्न पडला. मुळात आपण तिच्याशी काय बोललो असतो हा विचार त्याने आजवर केलाच नव्हता. ती समोर आली की पाहणे, ती नसेल तेंव्हा तिचा शोध घेणं इतकंच काम होतं. पण खरंच शेजारी बसली तर काय? त्याला वाटलं, विचार करायला हवा. मग त्याने मुद्दे काढले तिच्याशी बोलायचे. पिक्चर, अम्या-विक्या आणि अनेक लेखक हे सोडून काहीच नव्हतं त्याच्याकडे बोलायला. मग त्याला एकटं वाटू लागलं. आपण ज्या व्यक्तीला इतकं जवळचं समजतो तिच्याशी बोलायला काहीच नाही? प्रश्नांमधून तो आपलं अस्तित्व शोधत होता. आकाश काळवटुन गेलं. पटांगणाच्या पलीकडल्या गणपती मंदिरातून आरतीची घंटा ऐकू येऊ लागली होती. तो चालत तिथंवर गेला. एक नवीन लग्न झालेलं जोडपं दिसलं दर्शनाला आलेलं. आरती संपल्यावर देवाला नमस्कार करुन पुन्हा गाडीकडे वळला. गाडी यंत्रवत घरी आली.

         यंत्रवतच जेवला आणि पलंगावर पडला. इतक्या दिवसांची अपमानात हरवलेली शरीराची भूक चाळवली. जग्याच्या कॅफे मध्ये बसून पाहिलेली ती फिल्म आठवू लागली. त्यातलं ते जोरजोरात आवाज काढणारं जोडपं. तो ताठरला आणि तितकाच लवकर शांतही झाला. एक क्षणही झाला नसेल आणि त्याला पश्चाताप होऊ लागला. हे असं त्याचं नेहमीचंच. पॉर्नच्या इतके व्हिडीओ पाहिलेले. पण शांत झाल्यावर हे सगळं नको वाटायचं. आपण त्या मोहाला भुललो म्हणून राग यायचा स्वतःचाच. अशा वेळी पुन्हा एकदा सपनीची आठवण यायची. तिची माफी मागून तिला कुशीत घेऊन झोपायची इच्छा बळावयाची. त्याने उशी पोटाशी धरली आणि कधीतरी त्याला झोप लागून गेली.

- क्रमशः

विद्या भुतकर. 

No comments: