Monday, October 29, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १८

सकाळ सकाळी पाटील चिडलेले होते. संत्या सातारच्या कार्यक्रमाची तयारी करत होता आणि इतक्यात पाटलांची हाक त्याला ऐकू आली. हाक कसली, आरडा ओरडाच तो. 
"काय झालं पप्पा?", संत्यानं विचारलं. काकीही पळतच बाहेर आली. 
"हे काय ऐकतुय मी? त्या टपऱ्या काढायला कुणी सांगितलं होतं?", त्यांनी संत्याला विचारलं. 
संत्या मान खाली घालून उभा राहिला. 
"अवो पन झालं तरी काय?", काकीला काही कळत नव्हतं. 
"त्या बसस्टँड वरच्या टपऱ्या उडवून टाकायचा अर्ज केलाय यानं. हे असले उद्योग करायच्या आधी मला इचारायचं तरी हुतं.", पाटील. 
"आईस्क्रीम, वडापाव, सगळं?", काकीने विचारलं. 
"सगळं बेकायदेशीर गाळे होतं ते. ", संत्या. 
"हातावरचं पोट त्या लोकांचं आन तुम्ही असं सरळ काढून टाकणार त्यांचा धंदा?", पाटलांनी रागानं विचारलं. 
"मी बघतोय त्यांच्या कामासाठी. आपल्या गावात, बाहेर कितीतरी कामं हायेत. तुम्ही का इतकं चिडताय? अन त्यांना कर्जावर घेता यील की जागा, धंद्याला पैसे. मी बोलावलाय एक मानूस उद्या, करियर कौन्सिलिंग म्हनतात त्याला. तो दिल त्यांना काय करता यील याची आयड्या.", संत्या बोलला. 
"ल्हान हाय अजून. शिकल की हळूहळू.", काकीनं मध्ये पडायचा प्रयत्न केला. पण त्यानं काही होणार नव्हतं. 
"हे बगा, तुमी बाकी सगळी कामं केलीत ती ठीक पन हे असलं लोकांचे धंदे बंद करायचं काम करु नका.", हे फायनल ऐकवून पाटील तिथून निघून गेले. 

        इतक्यात विक्या त्याला घ्यायलाच आला होता. आज सातारला कॉलेजात दादासाहेबांचा कार्यक्रम होता. गावांतून पोरांना मदतीला घेऊन जायची आज्ञा होती त्यांची. त्यात संत्या आता त्यांचा खास कार्यकर्ता बनला होता. 
"३ इनोव्हा आणल्यात आपल्या आन कोरेगावात दोन मिळतील. ", विक्या घरात येता येता बोलला होता. 
संत्यानं घड्याळ पाहिलं आणि झटक्यात कपडे बदलले. दोन-चार लोकांना फोन लावले आणि सगळी मंडळी गाड्यांमध्ये घालून निघाला. डोक्यांत पप्पांचं बोलणं अजून घोळतंच होतं. सातारला आल्यावर त्याच्या लक्षात आलं हे तर सपनीचं कॉलेज होतं. सकाळच्याभांडणात ते विसरुनच गेला होता तो. कॉलेजच्या ग्राऊंडवर दादासाहेबांचा मोठा कार्यक्रम होता. त्यांच्या हस्ते गरजू मुलांना साहित्य, मानधन मिळणार होतं. हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार होता. दुपारी तीन नंतर कार्यक्रम ठेवला होता. 
         तिथे पोचल्यावर मात्र संत्या लगेच कामाला लागला. मंडपवाल्याना बोलावून मंडप, मंच बांधून घेतला. खुर्च्या लागल्या. माईक, साऊंड सिस्टीम लागली. सपनाच्या क्लासमधली निम्म्याच्या वर मुलं गायब होती. आज हा कार्यक्रम म्हटल्यावर बोलून काही उपयोग नव्हताच. बरं, स्टाफ म्हणून नाईलाजानं थांबावंच लागणार होतं. दुपारचं प्रॅक्टिकल कॅन्सल करुन सगळी पोरं मंडपात जमली. बराच वेळ झाला तरी दादासाहेबांचा पत्ता नव्हता. लोकांची, पोरांची चुळबुळ वाढली होती. कॉलेजची पोरं ती, किती वेळ शांत बसणार? संत्या फोन लावून सतत माहिती काढत राहिला. लवकरच दादासाहेब आले आणि कार्यक्रम सुरु झाला. प्रतिष्ठितांचे मान-सन्मान झाले. प्रिन्सिपल सरांचं, दादासाहेबांचं भाषण झालं. 
         जागोजागी कार्यक्रमात संत्याचा वावर सपनाला जाणवत होता. स्टाफच्या पहिल्या रांगेत बसून ती त्याला न्याहाळत होती. त्याचं ते खादीतलं रूप वेगळंच दिसत होतं. त्याच्याकडे बघण्याच्या नादात ती मागे काय चालू आहे हे विसरुन गेली होती. 

"आज साहेबांनी आपला बहुमूल्य वेळ तर आपल्याला दिलाच आहे. पन अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि बाकीही गरजेच्या वस्तू दिल्या जानार हायेत. मी एकेकाचं नाव घेतो तसं त्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन या भेटीचा स्वीकार करावा. विठ्ठल जाधव, उमेश वाणी, महेश... ", संत्याचा आवाज ऐकून ती भानावर आली. 
"त्याचं बोलणंही किती बदललंय", सपनीने मनात विचार केला. 
एकेकाचं स्टेजवर येऊन वस्तूवाटप होईपर्यंत बराच वेळ गेला. थोड्याच वेळात साहेब निघालेही. 
संत्या पुढे होऊन माईक हातात घेऊन बोलला,"दादासाहेबांना महत्वाच्या कामासाठी निघावं लागणार आहे. तर पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानू. धन्यवाद साहेब.", असं बोलत संत्या त्यांच्या पाय पडला. त्यांनीही त्याला आशीर्वाद देऊन मिठी मारली. 
त्याच्या हातातून माईक घेत दादासाहेब बोलले,"इथं आल्याचा खूप आनंद होत आहे. आज संतोषरावांचं विशेष कौतुक करायचं आहे मला. त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या गावात इतक्या सुधारणा तर केल्याच आहेत. पण आजचा कार्यक्रमही त्यांच्या पुढाकारानेच पार पडला आहे. त्यांच्याकडून असंच देशकार्य होत राहावं ही सदिच्छा. त्यांना आणि तुम्हा आजच्या पिढीच्या युवकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. "
        इतकं बोलून दादासाहेब निघाले. संत्याने त्यांच्यासाठी गाडी काढायला सांगितली. ते खाली उतरल्यावर बाकीचा कार्यक्रम औपचारिकच होता. स्टाफचं चहापान झालं. तेही सर्व करण्यात संत्याने पुढाकार घेतला होता. सगळ्या प्रोफेसरना काय हवं नको ते तो बघत होता. 
'आयुष्यात स्वतःच्या सरांना इतका मान दिला नसेल, आणि आता गोड बोलतोय', सपनाच्या डोक्यात विचार आला. या सगळ्यांत इतका वेळ गेला होता. सपनाला घर गाठायची घाई होऊ लागली. स्टाफरुममध्ये येऊन तिचं राहिलेलं थोडंसं काम पूर्ण केलं आणि स्टॅंडकडे निघाली. उशीर झालाच होता. शेवटची तरी गाडी मिळावी म्हणून तिची धडपड चालू होती. 
        
          कॉलेजमधलं सर्व सामान मार्गी लावून संत्या इनोव्हा घेऊन परतीला लागला होता. बराच उशीर झाला सगळं उरकायला. गाडी नाक्यावर आली तशी त्याला स्टॉपजवळ सपना त्याला दिसली.त्याने तिला कुठूनही ओळखलं असतं. त्यात आता लेक्चरर म्हणून जायला लागल्यापासून ती साडी नेसून जाऊ लागली होती. ते पाहून तर त्याला अजूनच प्रेम यायचं तिच्यावर. आजच्या घाईतही त्याने तिला पहिल्या रांगेत टिपलं होतं. रस्त्यावर इतक्या उशिरा एकटीच पाहून संत्यानं गाडी थांबवली. तिच्या इतक्या जवळ गाडी थांबल्यावर ती दचकली. 
"उशीर झाला वाटतं?", त्यानं खिडकीची काच खाली उतरत विचारलं. 
        खरंतर आधी त्याची हिम्मतही झाली नसती तिला विचारायची. पण आजकाल एक नवीनच आत्मविश्वास मिळाला होता त्याला. 
"हां शेवटची बस चुकली आज. ट्रक्सची वाट बघत होतो.", सपनानं सांगितलं. 
"येताय का? मी सोडतो घरला.", संत्या बोलला. 
तिने घड्याळ पाहिलं. गाडीत वाकून पाहिलं तर अजून ५-६ पोरं होती. विचार करुन ती 'हो' म्हणाली. गाडीत पुढं बसलेलं पोरगं झटक्यात उडी मारुन मागं गेलं. ती पुढच्या सीटवर बसली आणि गाडी सुरु झाली. 

क्रमशः 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: